✨ सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला
भारत आणि इंग्लंड पाचवा कसोटी सामना 31 जुलैपासून सुरु होणार आहे. या सामन्यात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. का ते जाणून घ्या.
चौथ्या कसोटीच्या पहिल्याच डावात भारताला मोठा धक्का बसला आहे. ऋषभ पंतच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली असून फ्रॅक्चर आहे. त्यामुळे पुढचे सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे ऋषभ पंत पाचव्या कसोटी खेळणार नसल्याचं जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे त्याच्या जागी योग्य खेळाडूची निवड करण्यासाठी निवडकर्त्यांची धावपळ सुरु झाली आहे. ऋषभ पंतसाठी इशान किशन योग्य रिप्लेसमेंट ठरू शकते, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. दुसरीकडे, इशान किशनच्या टीम इंडियातील पुनरागमनासाठी पायघड्या घातल्या जात असल्याची चर्चा आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडू मिळालेल्या माहितीनुसार इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिलं आहे की, भारतीय निवडकर्ते पाचव्या कसोटीसाठी इशान किशनला बोलवू शकतात. जर असं झालं तर दोन वर्षांनी टीम इंडियात खेळणार आहे. इशान किशन शेवटचा कसोटी सामना जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. तर शेवटचा टी20 सामना नोव्हेंबर 2023 मध्ये खेळला होता.
कारण म्हणजे तो 'विकेटकीपर'
ऋषभ पंतच्या जागी इशान किशनच का? तर त्यामागे पाच कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे तो विकेटकीपर आहे. दुसर कारण, इशान किशन ऋषभ पंतसारखा आक्रमक खेळतो. तिसरं कारण ऋषभ पंत ज्या जागी फलंदाजी करतो त्या जागेवर इशान किशन आरामात खेळू शकतो. चौथं कारण इशान किशन काउंटी क्रिकेटमध्ये नॉर्थेम्प्टनशरसाठी खेळला असून चांगली फलंदाजी केली. त्याने 87 आणि 77 धावांची खेळी केली. पाचवं कारण म्हणजे काउंटी क्रिकेट आणि इंडिया अ साठी खेळला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या वातावरणाची चांगली जाण आहे.
रिपोर्टनुसार, अजीत आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने इशान किशनशी संपर्क साधला आहे. त्यामुळे ओवलवर पाचव्या कसोटीसाठी संघाचा भाग ठरू शकतो. त्यामुळे पाचव्या कसोटीत इशान किशन मैदानात दिसला तर आश्चर्य वाटायला नको. जर असं झालं तर टीम इंडियाची दारं त्याला दोन वर्षानंतर खुली होणार आहेत. इशान किशनने चांगली फलंदाजी केली तर त्याचं संघातील स्थानही निश्चित होऊ शकतं. कारण ऋषभ पंत हा वारंवार काही ना काही कारणास्तव दुखापतग्रस्त होत असतो. त्यामुळे संघात त्याची चांगली रिप्लेसमेंट असणं आवश्यक आहे.